प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा Prerana Jijaunchi Vasa Savitricha
प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा Prerana Jijaunchi Vasa Savitricha
हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवरायांच्या माता अर्थात भारत राष्ट्राच्या माता राष्ट्रमाता जिजाऊ या प्रेरणेचा जिवंत आणि सार्वकालिक स्रोत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवबाला जन्म दिला आणि दोघांनी मिळून स्वातंत्र्याला जन्म दिला आणि स्वातंत्र्याची धगधगती मशाल नव्हे तर यज्ञकुंड अवघ्या हिंदुस्तानात पेटले.
सत्यशोधक विचार, आचार आणि दीनदलित आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा गौरवशाली वसा आणि वारसा निर्माण करणाऱ्या क्रांतीज्योती अर्थात आधुनिक सरस्वती सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षण आणि बहुजनांच्या पुनरुत्थानासाठी गेल्या पावणेदोनशे वर्षात प्रेरणास्रोत ठरले आहेत.
राष्ट्रमाता जिजाऊंनी त्याकाळच्या शतकानुशतके परकीय आक्रमकांच्या विरुद्ध स्वातंत्र्याचे यज्ञकुंड पेटवण्यासाठी स्वतःच्या मुलाला नव्हे… नव्हे संपूर्ण हिंदुस्तानला प्रेरणा दिली. आज आपल्याला वाटते कि छत्रपती शिवराय पुन्हा जन्माला यावेत. तर मला असे वाटते की यासाठी पहिल्यांदा राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला येणे गरजेचे आहे.
राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिवनेरीवर जन्म दिला. शिवरायांच्या कर्तृत्वाला फुलवण्यासाठी स्वातंत्र्याचे संस्कार त्यांच्यावर केले. सतराव्या शतकात सर्वत्र गुलामगिरीची अमंगळ दुर्गंधी येत असताना स्वातंत्र्याचा सुगंध निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवरायांना खऱ्या अर्थाने गुरुमंत्र दिला. शिवरायांच्या त्या केवळ माताच नव्हत्या तर गुरुही होत्या. शिवरायांना त्यांनी प्रत्येक प्रकारचे शिक्षण घरातच दिले. आज आपण आपल्या मुलांना एखादा चाकू हातात घेतला; तर त्याला लागेल म्हणून तळमळतो. परंतु त्याच वयामध्ये शिवबाच्या हाती ढाल, तलवार, दांडपट्टा अशी शस्त्रे दिली आणि त्यात प्रवीण केले.
छत्रपती शिवराय म्हणजे जिजाऊंच्या विचारांचा जिवंत आणि ज्वलंत आविष्कार होता. केवळ शिवरायांना नव्हे तर त्या काळातील स्वातंत्र्यासाठी म्हणजे स्वराज्यासाठी तळमळणार्या प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला जिजाऊंनी प्रेरणा देऊन उभे केले. मोगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज, सिद्दी,इंग्रज अशा परकीय आक्रमकांच्या विरुद्ध महाराष्ट्र उभा ठाकला. तो केवळ जिजाऊंच्या प्रेरणेनेच त्यामुळे मला असे म्हणावे वाटते कि जिजाऊ या खऱ्या अर्थाने प्रेरणेचा जिवंत स्त्रोत आहेत.
एतद्देशीयांचे हिंदवी स्वराज्य निर्माण करणे ही त्या काळातली अतिशय कठीण आणि खडतर गोष्ट होती. जिथे पावलोपावली मृत्यूचा सामना होण्याची शक्यता होती अशा ठिकाणी आपल्या मुलाला त्यांनी उभे केले. अफजलखानाच्या संकटावर मात करताना जिजाऊंनी थोरले महाराज शहाजी राजे आणि छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू संभाजीराजे यांना अफजलखानाने दिलेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी प्रेरित केले. शिवरायांच्या बरोबर लढणाऱ्या बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, सुभेदार तानाजी, कोंडाजी फर्जंद अशा हजारो लोकांना सुद्धा त्यांनी प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार मोठ्या धीरोदात्तपणे अखंड सुरू ठेवला. केवळ शिवरायांना नाही तर छत्रपती संभाजी महाराजानाही उत्तम असे संस्कार देऊन स्वराज्याचा युवराज कसा असावा याचा वस्तुपाठ दिला. छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर स्वराज्याचा लढा पराभूत न होता धीरोदात्तपणे संभाजीराजे लढले ते जिजाऊंच्या प्रेरणेनेच. एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या वीर मरणानंतर स्वराज्यातील प्रत्येक माणूस या भूमीमध्ये औरंग्याच्या आक्रमणाविरुद्ध जोरकसपणे लढला तो जिजाऊंच्या प्रेरणेमुळेच.
आजही संपूर्ण भारत वर्षाला छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ, शहाजीराजे, छत्रपती संभाजी राजे आणि एकूणच त्या काळातील स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावून प्रसंगी धारातीर्थ पडलेले सर्व स्वराज्याचे शिलेदार प्रेरणादायी ठरलेले आहेत. यामागे राष्ट्रमाता जिजाऊंची खऱ्या अर्थाने प्रेरणा आहे हे निर्विवाद.
स्वाभिमानाने उभे कसे राहावे? परक्यांशी कसे लढावे? स्वातंत्र्याचे यज्ञकुंड पेटते कसे ठेवावे? शत्रूशी लढताना कोणती आणि कशी नीती वापरावी? जीवनामध्ये आलेल्या संकटांचा सामना कसा करावा? आपण स्री असलो तरी ताठ मानेने कसे जगावे? स्वराज्यातील प्रत्येक माणसाला स्वातंत्र्याची फळे कशी मिळतील आणि तो सुखाने समाधानाने कसा राहील याची काळजी कशी घ्यावी? ही जिजाऊंनी आपल्याला शिकवले.
छत्रपती शाहूमहाराजांनी आधुनिक काळामध्ये जो आदर्श राजा कसा असावा याची शिकवण आपल्या राज्यकारभारातून दिली त्या मागे जिजाऊ आणि स्वराज्याचे जाणते राजे छत्रपती शिवरायांची अखंड प्रेरणा आहे. भारताची राज्यघटना लिहीताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवरायांचे स्वराज्य आठवावे ही जिजाऊंची प्रेरणा आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नंतर तळागाळातील प्रत्येक माणसाला शिक्षण देऊन ताठमानाने आणि स्वाभिमानाने कसे उभे राहावे याचे शिक्षण आधुनिक सरस्वती सावित्रीबाईंनी आपल्या आचरणातून, विचारातून आणि कर्तृत्वातून दिले.
सर्वसामान्य बहुजन समाजातील अठरापगड जाती जमातीतील दीनदलितांना आणि धर्माच्या रूढी-परंपरांच्या बेड्यांनी गुलामगिरीत जीवन जगत असलेल्या स्त्रीला खऱ्या अर्थाने उभे करण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जोतीबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या नसत्या तर जोतिबांनाही हिमालयाएवढे आपले शैक्षणिक कार्य करता आले नसते असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.
1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील भिडे वाड्यामध्ये भारतातील पहिली अस्पृश्यांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा उघडणाऱ्या फुले दाम्पत्याला भारत देश कधीही विसरणार नाही. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आणि ते शिक्षण हीच महान शक्ति असून ती दीनदलितांच्या उद्धारासाठी एक मात्र प्रभावी शास्त्र, शस्त्र आणि अस्त्र आहे हे त्यांनी बरोबर ओळखले होते.
मुलींच्या आणि दीनदलितांच्या शिक्षणासाठी दररोज टिंगल टवाळी ऐकणे, शेणाचे गोळे झेलणे, सतत अपमान सहन करणे यासाठी फार फार मोठे अंतकरण लागते. ज्योतीबांकडून ही प्रेरणा सावित्रीबाईंनी घेतली. स्वतःसाठी कधीही ही उंची वस्त्र सावित्रीबाईनी वापरले नाही परंतु अनाथ मुलांच्या अंगावर वस्त्र कसे राहील? विधवा स्त्रियांना निर्भय आसरा कसा मिळेल? असाच विचार सावित्रीबाईंनी सतत केला म्हणून आजच्या स्त्रिया ताठ मानेने आणि स्वाभिमानाने सावित्रीच्या लेकी म्हणून समाजामध्ये वावरत आहेत.
जोपर्यंत ज्योतिराव सावित्रीबाई बरोबर होते तोपर्यंत सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना साथ दिली आणि जोतीरावांच्या निधनानंतर सुद्धा त्यांचे कार्य अगदी नेटाने पुढे नेले. स्वतःच्या दत्तक मुलाला यशवंताला उच्च शिक्षण दिले, डॉक्टर केले.परंतु त्याच्या विद्वत्तेचा उपयोग समाजाच्या उद्धारासाठी सावित्रीबाईंनी केला. 1896-97 च्या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाईंनी प्लेगच्या रोग्यांसाठी जे कार्य केले तसे त्या काळातील मोठ्या मोठ्या बोलघेवड्या, कृतीशून्य पुढाऱ्यांनाही करता आले नाही. त्याच कामामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झोकून दिले. पुढे सावित्रीबाईंना त्यामध्ये मृत्यू आला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा समाज शिक्षणाचा समाज उद्धाराचा वसा आणि वारसा आज आपल्यापुढे इतक्या जिवंत स्वरूपामध्ये उभा आहे की हा वसा आणि वारसा पुढे चालवणे आजच्या काळात अतिशय आवश्यक आहे.
तमाम महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला राष्ट्रमाता जिजाऊंची प्रेरणा आणि सावित्रीबाईंचा वसा आणि वारसा एवढ्या दोनच गोष्टी पुरेशा आहेत. तो वारसा चालवणे हे आधुनिक काळातील स्त्री-पुरुषांची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. जिजाऊंची प्रेरणा आणि सावित्रीबाईंचा वसा-वारसा आपल्याला लाभला आहे ही किती मोठी गोष्ट आहे ! तो वसा आणि वारसा विसरणे, ती प्रेरणा विसरणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. म्हणून त्या प्रेरणेची आणि वारशाची सातत्याने दखल घेतली गेली पाहिजे.
Best