महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? Maharashtra Din in Marathi
आज आपण या लेखांमध्ये महाराष्ट्र दिन 1 मे Maharashtra Day(Maharashtra Din in Marathi) 1May याविषयी माहिती घेणार आहोत.
“बहू असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा
प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा“
असे गुण वर्णन श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी महाराष्ट्रगीतामध्ये महाराष्ट्राचे असे गुणवर्णन केलेले आहे. ते महाराष्ट्र राज्य स्वतंत्र भारतामध्ये एक घटक राज्य म्हणून ज्या दिवशी उदयाला आले तो दिवस म्हणजेच 1 मे 1960 होय. हाच दिवस महाराष्ट्र दिन Maharashtra Din in Marathi म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषिक जनता अतिशय आनंदाने, उत्साहाने साजरा करत असते.
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. याच दिवशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला फार मोठे यश येऊन स्वतंत्र मराठी भाषिक राज्याची मुहूर्तमेढ हरवली गेली.106 हुतात्म्यांचा बळी आणि अगणित महाराष्ट्र भक्तांच्या लढ्याला प्रचंड मोठे यश येऊन महाराष्ट्र हे घटक राज्य तयार झाले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राची नेतृत्वाची धुरा यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सुपूर्द केली. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्राच्या हाती सोपवण्यात आला.आणि महाराष्ट्र हे एक स्वतंत्र भारतातील घटक राज्य म्हणून उदयाला आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन Swatantryaveer Savarkar Gaurav Din
भारतीय स्वातंत्र्याची पहाट होत असतानाच भाषावार प्रांतरचना असावी असा विचार तत्कालीन राष्ट्रीय सभेमध्ये झाला. पुढे स्वातंत्र्य मिळताच भाषावर प्रांतरचनेसाठी अनेक प्रकारच्या कमिट्या नेमल्या गेल्या. यामध्ये महाराष्ट्रावर अन्याय झाला. मराठी आणि गुजराती भाषिकांचे एक राज्य निर्माण झाले. महाराष्ट्रीय माणसाला स्वतःच्या मराठी भाषिकांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य हवे होते.
महाराष्ट्रीय माणूस हा अन्याय सहन करणारा नाही त्याचा मूळचा पिंड स्वाभिमानी असून तो बंडखोर वृत्तीचा आहे त्यामुळे केंद्र शासनाने महाराष्ट्रावर केलेला अन्याय सहन होणे महाराष्ट्रीयन माणसाला शक्य नसल्याने प्रबोधनकार ठाकरे, आचार्य प्र.के.अत्रे, एसएम जोशी, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट अशा महाराष्ट्रीयन नेतृत्वाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सामुदायिक नेतृत्व करून संयुक्त महाराष्ट्राचा लढा विजयी होईपर्यंत लढला… यशस्वी केला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. तोच हा पवित्र, पावन आणि मंगल दिवस होय.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भाषण करताना आचार्य अत्रे म्हणाले होते.”महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतर सर्व राज्यांना फक्त भूगोल आहे.“यातील अतिशयोक्तीपूर्ण भाग सोडला तर महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा किती जाज्वल्य आणि स्वाभिमानी आहे हे दिसून येते.
महाराष्ट्र हे एक महान राष्ट्र व्हावे इतपत मोठे आणि ऐतिहासिक,सांस्कृतिक वारसा लाभलेले एक महान राज्य आहे. महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती परंपरा लाभलेली आहे. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर,मुक्ताबाई, सोपानदेव, गोरोबाकुंभार,संत सावतामाळी, संत चोखोबा, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास अशा महान संतांची मांदियाळी लाभलेला महाराष्ट्र हा संतांचा वावर असणारा प्रांत आहे. महाराष्ट्रातील संतांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वारकरी पंथ अर्थात भागवत संप्रदायाचा विस्तार करून अतिशय प्रागतिक विचारांची मशागत करून महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मध्ययुगीन कालखंडामध्ये दिली.
महाराष्ट्र ही शूरांची, वीरांची आणि अफाट पराक्रमाची गाथा निर्माण करणारी भूमी आहे. महाराष्ट्राच्या भूमीने स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये आपल्या आहुतीचा बळी देण्यासाठी कधीही मागे पुढे पाहिले नाही. अशा या महाराष्ट्राने ज्यावेळी हिंदुस्थानात सुलतानी आक्रमकतांचा नंगानाच सुरू होता आणि संपूर्ण भारत परकीय आक्रमकतेचा बळी ठरला होता अशा काळामध्ये देशाचे नेतृत्व हाती घेतले आणि देशाला स्वातंत्र्याचे तोरण बांधले.
महाराष्ट्र शहाजीराजे आणि जिजाऊ मातेचे सुपुत्र छत्रपती शिवराय यांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वातंत्र्याचे बीज पेरले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हेच हिंदवी स्वराज्य पुढे मराठा साम्राज्य म्हणून उदयाला आले. महाराष्ट्रीय माणसाचा वावर संपूर्ण देशात होऊ लागला.एवढेच नव्हे तर अटकेपार झेंडे ही महाराष्ट्राने त्यावेळी लावले.
माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पाहिजे जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण असे संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकामध्ये आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये म्हटले महाराष्ट्राची ही स्वाभिमानी परंपरा संतांनी निर्माण केली आणि धारकरी मावळ्यांनी महाराष्ट्राच्या परंपरेला ऐतिहासिक समृद्ध असा वारसा निर्माण करून दिला हा वारसा जपणारी महाराष्ट्र राज्य हे केवळ वारकरी धारकरी आणि विविध परंपरांचे राज्य आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा असे कवी कुसुमाग्रजांनी म्हणून महाराष्ट्राच्या राज्यभाषा मराठी विषयी म्हणून ठेवले आहे.
“मंगल देशा, पवित्र देशा महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा,
अंजन कांजन करवंदीच्या काटेरी देशा,
बकुल फुलांच्या प्राजक्ताच्या दळधारी देशा” असे कवी गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राबाबत म्हणून ठेवलेले आहे. गोविंद प्रभू यांनी विवेकसिंधू हा ग्रंथ लिहिला. पुढे संत परंपरेने ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, भावार्थरामायण ,एकनाथी भागवत,दासबोध, तुकाराम गाथा असे अनेक अनेक एकापेक्षा सुंदर ग्रंथ निर्माण केले. चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या महानुभव पंथाची भाषा ही मराठी भाषा आहे.केवळ संतांनीच नव्हे तर पंडितांनी ही आपली काव्यपरंपरा पुढे चालू ठेवली. पारतंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा अनेक कवींनी आणि लेखकांनी अतिशय दर्जेदार वांङ्मयनिर्मिती मराठी भाषेमध्ये केली आणि मराठी भाषा समृद्ध केली. अशी ही समृद्ध असलेली प्राचीन मराठी भाषा असणारा महाराष्ट्र राज्य एक भारतातील महत्त्वपूर्ण राज्य आहे.
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आज जवळजवळ 73 वर्षे झाली. महाराष्ट्र आपल्या सर्व क्षेत्रातील प्रगतीने संपूर्ण भारत देशामध्ये कायमच पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. महाराष्ट्राने स्वतंत्र भारताच्या तिजोरीमध्ये कायमच मोठी भर टाकून आपले योगदान दिले आहे. आज महाराष्ट्र राज्य संपूर्ण भारतामध्ये एक अग्रेसर आणि आधुनिक राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राची ही प्रगती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचणे अजूनही गरजेचे आहे. हे कार्य महाराष्ट्राला करायचे आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या आक्रमक लढ्यानंतर मराठी भाषिकांना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य मिळाले. परंतु महाराष्ट्राचा बेळगाव, कारवार,धारवाड इत्यादी मराठी भाषिक मूळचा भाग अजूनही महाराष्ट्रामध्ये अंतर्भूत झालेला नाही. सीमा भागातील मराठी भाषिक जनता अजूनही त्यासाठी लढा देत आहे. त्या ठिकाणच्या मराठी भाषेवर प्रचंड अन्याय होत आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनता निश्चितच ह्या सीमावर्ती भागातील मराठी भाषिक बांधवांच्या बरोबर आहे. हा अन्याय महाराष्ट्रीयन माणूस उघड्या डोळ्यांनी पाहत आहे परंतु या अन्यायावरचा मार्ग न्यायालयाच्या दारात जाऊन पडलेला आहे. त्या ठिकाणी चालू असलेल्या खटल्यांमध्ये महाराष्ट्र सरकार जनतेच्या वतीने भूमिका मांडत आहे. या ठिकाणीही महाराष्ट्राचा विजय होईल आणि सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना निश्चितच न्याय मिळेल.
“दुर्लभं भारते जन्मः महाराष्ट्रे त्वतिदुर्लभः“असे एका सुभाषितकाराने म्हणून ठेवलेले आहे. भारतामध्ये जन्म मिळणे कठीण आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तर अतिशय कठीण.अशा या महाराष्ट्र राज्यामध्ये आपला जन्म झाला याची मला खूप धन्यता वाटते. एक महाराष्ट्रीय मराठी भाषिक माणूस स्वाभिमानाने आणि गौरवाने मिरवण्यात धन्यता वाटते.
एक मे या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन Maharashtra Din in Marathi अतिशय उत्साहात साजरा केला जातो. अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज मंत्रालयापासून तर ग्रामपंचायत पर्यंत सर्वत्र ध्वजारोहण करून उभारला जातो. मानवंदना दिली जाते. विविध प्रकारचे उपक्रम या दिनानिमित्त राबवले जातात. विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव पुरस्कार देऊन केला जातो. सर्वत्र अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे मांगल्यमय वातावरण असते.
महाराष्ट्र दिन Maharashtra Din in Marathi लेख आपल्याला निश्चितच आवडला असेल. आपल्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपण देऊ शकता त्याचप्रमाणे यासारखे इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक अवश्य करा.