संविधान दिन निबंध Essay on Sanvidhan Din
Table of Contents
संविधान दिन निबंध Essay on Sanvidhan Din
आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. एखाद्या खंडप्राय देशाचा कारभार चांगल्या रीतीने चालण्यासाठी मजबूत अशा संविधानाची गरज असते. राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न,प्रज्ञासूर्य,महामानव,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला अतिशय मजबूत असे संविधान निर्माण करून दिले.
भारतीय संविधानाची निर्मिती
भारताचे स्वातंत्र्य दृष्टीपथात आल्यानंतर भारत देशासाठी एक चांगल्या प्रकारचे संविधान निर्माण केले जावे.यासाठी घटना समितीची स्थापना झाली. घटना समितीमध्ये अतिशय महत्त्वाची अशी मसुदा समिती होती. तिलाच प्रारुप समिती असेही म्हटले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर आंबेडकर यांच्या नेतृत्व आणि अभ्यासातून संविधानाची निर्मिती झाली. भारताचे संविधान तयार होण्यासाठी जवळ जवळ दोन वर्षे 11 महिने आणि 22 दिवस एवढा प्रचंड मोठा कालखंड लागला.
भारताच्या राज्यघटनेची अर्थात संविधानाची पीडीएफ मिळण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
अनेक अभ्यासपूर्ण चर्चा, वाद-विवाद,संशोधन यामधून भारताचे संविधान निर्माण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान अर्थात राज्यघटना घटना समितीला 26 नोव्हेंबर 1949 रोजी सोपवली. एक प्रकारे देशाला अर्पण केली.संविधानाचे हे एक प्रकारे लोकार्पण होते. एका लोकशाही राष्ट्रासाठी संविधान निर्माण झाले ही काही सामान्य घटना नव्हती.
या घटनेच्या स्मरणार्थ 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन पाळावा अशी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांची इच्छा होती. त्यानुसार 26 नोवेंबर 2015 पासून भारतात सर्वत्र संविधान दिन पाळला जातो.साजरा केला जातो.या निमित्ताने भारतीय संविधानाचे प्रास्ताविक विविध ठिकाणी शाळा-कॉलेजे, न्यायालय, पोलीस स्टेशन, सरकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी वाचन केले जाते. आणि संविधान दिन अतिशय उत्साहात साजरा केला जातो.
संविधान वाचनामागील उद्देश
भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत केले गेले.त्याचप्रमाणे अधिनियमित होऊन ते स्वतः प्रत अर्पण केले गेले.म्हणजेच भारतीयांनी भारतीयांसाठी स्वतंत्रपणे राज्यघटना निर्माण करून स्वतःला अर्पण केली. भारताचे संविधान हा एक मोठा कायदे तत्वांचा अनमोल ग्रंथ आहे. या संविधानाची प्रास्ताविक आहे ते मोजक्याच शब्दांमध्ये लिहिलेले आहे. परंतु संपूर्ण भारतीय संविधान या प्रास्ताविकाशी बांधील आहे. या प्रास्ताविकातील प्रत्येक शब्द हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि अर्थपूर्ण असून भारतीयांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतीक असलेले प्रतिबिंबच आहे.
अशीही प्रास्ताविका अर्थात संविधान काय आहे. हे प्रत्येक भारतीयाला आणि उगवत्या पिढीतील प्रत्येक मुलाला, मुलीला माहिती असले पाहिजे.आपल्या देशाची जीवन ध्येये काय आहेत हे शालेय वयातच माहिती होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे. आपल्या देशाची बांधिलकी, आपल्या देशातील नागरिकांची बांधिलकी ही फक्त आणि फक्त राज्यघटनेशी आहे. याचा एक अमिट सुसंस्कार यानिमित्ताने होणार आहे आणि ही अतिशय गरजेची गोष्ट आहे.
संविधान दिनाच्या निमित्ताने आपल्या देशाच्या राज्यघटनेची ओळख भारतीयांना होईल राज्यघटना काय आहे? कशी आहे?त्यामध्ये आपले हक्क कोणते आहेत?आपली कर्तव्य कोणती आहेत? या प्रश्नांचा मागोवा यानिमित्ताने सहजच नागरिकांकडून घेतला जाईल आणि भारतीय लोकशाही तिला ही गोष्ट पूरक होईल किंबहुना ती पूरक व्हावी अशीच भूमिका किंवा उद्देश संविधान दिन साजरा करण्यामागे आहे.
संविधानाचे वाचन कशासाठी?
संविधानाच्या प्रास्ताविकाच्या वाचनामुळे बालवयापासूनच भारताचे संविधान काय आहे? हे शालेय वयातच मुलांना माहीत होईल. संविधानात असलेल्या शब्दांचा अर्थ मुलांना उमलत्या वयामध्ये जसजसा समजेल तसतसा भारताचा संस्कृतीमूलक आत्मा समजू लागेल.
मुलांची मने संविधान वाचनाने सुसंस्कारित होतील. आपल्या देशाचा कारभार एका मजबूत अशा संविधानाने चाललेला आहे. त्याला काही एक शिस्त आहे. परंपरा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे युगानुयुगे भारतीयांनी जपलेल्या जीवनमूल्यांचा संविधान म्हणजे एक अनमोल असा वारसा सांगणारा दिशादर्शक ग्रंथ आहे की जो भारताच्या भविष्यातील प्रगतीचा मार्गदर्शक असा भव्य दिव्य दीपस्तंभ आहे.
संविधानाची प्रास्ताविका वाचता वाचता संविधानाचा अर्थ समजू लागेल.संविधानामधील कायदे, तत्व यांचा जिज्ञासापूर्ण मागोवा प्रत्येक नागरिक घेऊ लागेल आणि त्याला हे कळेल की संविधान हा सर्व धर्मियांसाठी असलेला आधुनिक काळातील एक अनमोल असा,जीवनाला आदर्श देणारा खरा, शाश्वत मूल्यांचा प्रसार करणारा,वैज्ञानिक दृष्टीने संपन्न असणारा, नव्या धर्माचा जणू काही ग्रंथच आहे. आणि विशेष म्हणजे संविधानाने दिलेला धर्म म्हणजेच भारतीयत्व होय.
संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
संविधान दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनुवाचन करायचे आहे. संविधान दिनाच्या दिवशी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करावे. या दिवशी भारतीय संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर्स,घोषवाक्य स्पर्धा,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करून संविधानाप्रती जागृकता आणि जिज्ञासा निर्माण करायची आहे.
संविधान विषयक जागृतता निर्माण होण्यासाठी शाळा,महाविद्यालये,पोलीस स्टेशन, न्यायालय, शासकीय कार्यालय,त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये या ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे दर्शनी भागात लेखन करून घ्यावे. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ते सहज दिसेल व त्याचे वाचन होईल.
राष्ट्रीय विज्ञान दिन वर निबंध 28 February National Science Day
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Quotes of Dr.Ambedkar
वाचन प्रेरणा दिन Reading Motivation Day
27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन 27 February Marathi Bhasha Gaurav Din
खूपच छान माहिती दिली आहे.