हे विश्वची माझे घर निबंध Essay On He Vishwachi Maze Ghar
हे विश्वची माझे घर निबंध Essay On He Vishwachi Maze Ghar
संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या सुप्रसिद्ध अशा ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये हे विश्वची माझे घर ही संकल्पना मांडली आहे. खरेतर संपूर्ण विश्वाला कवेत घेऊ पाहणारी ही संकल्पना आहे. भारतामध्ये संपूर्ण विश्व हे आपल्या घरात सारखे आहे आणि विश्वातील सर्व जीवमात्र हे आपले बांधव आहेत ही भावना फार प्राचीन काळापासून रुजलेली आहे.
हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर।
किंबहुना चराचर। आपण पै जाहला ॥
असे संत ज्ञानेश्वर विश्वबंधुत्वाची संकल्पना ज्ञानेश्वरी मांडताना म्हणत आहेत. ही ओवी अतिशय प्रसिद्ध अशी ओवी आहे. स्थितप्रज्ञ अशा साधू पुरुषाची लक्षणे सांगताना संत ज्ञानेश्वर आपल्या कल्पनेची भरारी संपूर्ण विश्वापर्यंत नेतात. एका साधूवृत्तीच्या व्यक्तिमत्वाला संपूर्ण विश्व हे एका घरासारखे असते. आपल्या घरामध्ये जसे आपण वावरतो तसा हा मनुष्य संपूर्ण विश्वामध्ये वावरू शकतो, राहू शकतो. हेच संत ज्ञानेश्वरांना यातून सांगायचे आहे.
भारतीयांनी संपूर्ण पृथ्वी हेच आपले कुटुंब मानले आहे.आपला आणि परका असा कोणताही भेदभाव भारतीय संस्कृती मानत नाही.
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् । उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥
हा आपला तो परक्याचा अशी अशी मांडणी संकुचित दृष्टिकोनाची माणसे करत असतात. मात्र उदार आणि मोठ्या मनाची माणसे संपूर्ण पृथ्वीला एका कुटुंबासाठी ही मानतात. वसुधैव कुटुम्बकम वैदिक काळातील संकल्पना संत ज्ञानेश्वरांनी हे विश्वचि माझे घर या ओवीमधून पुनश्च एकदा मांडलेली आहे.
संत ज्ञानेश्वर मराठी निबंध Essay On Sant Dnyaneshwar
वरील सुभाषितातील भावना संत ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घर या ओवीमधून अतिशय सुंदर अशा अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेतून सुलभपणे मांडलेली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये जाती-धर्मांमध्ये प्रचंड मोठा भेदभाव निर्माण झाला होता.वर्णव्यवस्थेमुळे समाजामध्ये एक प्रकारची कटुता निर्माण झाली होती. सामान्य माणसाला सामान्य जीवन चांगल्या प्रकारे जगता येत नव्हते. मानवतेची पाळेमुळे वर्ण व्यवस्थेमुळे उखडली जात होती. हे अतिशय भयानक होते. स्वतः संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना याचे चटके बसले. त्यांचा उच्चवर्णामध्ये जन्म झाला. असे असले तरी समाजातील रूढी परंपरा आणि धर्माच्या कट्टर त्यामुळे त्यांचे जीवन त्यांना दुःसह झाले.
संत ज्ञानेश्वर हे कवी होते. आपल्या भावना कवी आपल्या शब्दांतून अतिशय चपखलपणे मांडतो. संत ज्ञानेश्वरांनी प्राचीन धर्मातील संकल्पना तेराव्या शतकात पुन्हा पुनरुज्जीवित करताना विश्वबंधुत्वाची गरज ओळखून हे विश्वची माझे घर असे म्हटले आहे.
आजच्या आधुनिक काळामध्ये जागतिकीकरण globalisation फार मोठ्या प्रमाणावर होत आहे जागतिकीकरणामध्ये संपूर्ण विश्व हे एक खेडे किंवा गाव आहे. अशी संकल्पना मांडली जाते.परंतु ही संकल्पना ही प्राचीन भारतीयांनी मांडलेली आहे. आणि विशेष म्हणजे जगामध्ये सर्वात आधी या संकल्पनेचा उदय भारतामध्ये झाला हे भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.
संपूर्ण विश्वातील मानव एकाच मानवी वंशाचा उत्क्रांत झालेला आधुनिक मानव आहे. सर्व माणसे एकच आहेत. सर्व माणसे समान आहेत.सगळीकडे समता आणि समानता भरलेली आहे.माणसांमध्ये कितीही जाती-जमाती, धर्म-पंथ, उपपंथ, संप्रदाय, भाषा, रंग, वंश असे भेद असले तरी सुद्धा जगभरच्या माणूस हा एकच आहे.
जगामध्ये प्रचंड विविधता आहे. ही विविधता फार मोठ्या प्रमाणात सर्वत्र दिसून येते.पण या विविधते मधून आपल्याला एक समान सूत्र सापडते. ते सूत्र म्हणजे सर्व मानव हा मानवता या एकाच धर्माचा पाईक आहे. मात्र वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये समाज रानटी अवस्थेतून नागरिक होत असताना काही नियम निर्माण झाले. त्या नियमांनी समाज बद्ध झाला. त्याच नियमांना पुढे धर्माचे नियम म्हटले गेले आणि धर्माची निर्मिती झाली. ही धर्माची निर्मिती फक्त समाजामध्ये असलेल्या रानटीपणाला घालवण्यासाठी होती. मात्र काळाच्या ओघात यामध्ये रूढी, परंपरा,कर्मकांड यांनी माणसामाणसात भेद निर्माण झाले. त्यामुळे मानवतेचा धर्म हा मूळ गाभाघटक माणसे विसरू लागली. तेव्हा संत ज्ञानेश्वरांसारख्या महापुरुषांनी विश्वबंधुत्वाची संकल्पना पुन्हा समाजासमोर आणली.
ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे पाया रचणारे महान संत तेराव्या शतकात होऊन गेले. सर्वसामान्य माणसाला त्यांनी आपल्या या वाणी आणि वांङ्मय यातून अतिशय मार्मिकपणे उपदेश केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे मराठी भाषेला आलेला सुगंधी फुलोरा आहे. मराठी भाषेतील ग्रंथाने मराठी भाषेला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले.ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथातून धर्मतत्वे अतिशय सहजपणे बाहेर पडली. ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत सारख्या भाषेला कोणताही कमीपणा येऊन देता मराठीची थोरवी फार सुंदरपणे मांडली आहे. हेच हे विश्वची माझे घर या ओळींमधून आपल्याला दिसून येईल.
आधुनिक काळामध्ये सुद्धा हे विश्वची माझे घर या वृत्तीने मनुष्य आपल्या उत्क्रांतीचे टप्पे गाठत आहे. आपली प्रगती करत आहे. ही जी विश्वबंधुत्वाची संकल्पना आहे, या संकल्पनेप्रमाणे जग चालले तर जगामध्ये शांतता निर्माण होईल आणि विश्वशांती निर्माण होऊन संत ज्ञानेश्वरांनी मागितलेल्या पसायदानाप्रमाणे सर्वजण सुखी होतील. इतकी प्रचंड शक्ती या संकल्पनेत आहे.